Friday, April 13, 2018

** *श्री स्वामी समर्थ महाराजांचा १४० वा समाधी दिन* (विशेष लेख) **

** *श्री स्वामी समर्थ महाराजांचा १४० वा समाधी दिन* **
** *(विशेष लेख व श्री स्वामी समाधी दर्शन ! अवश्य वाचा व शेअर करा)* **

आज चैत्र कृष्ण त्रयोदशी ! ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ महाराजांचा १४० वा समाधी लीला दिन (१४ एप्रिल २०१८) !! श्री स्वामी महाराज आपल्यातून मुळात गेलेच नाही त्यामुळे आपण या दिवसाला मुद्दामून पुण्यतिथी असे न म्हणता समाधी लीला दिन असे म्हणत आहोत.  श्री स्वामी समर्थ महाराज जरी सदैव आपल्यामध्ये असले तरीही स्वामींनी याच दिवशी समाधी ग्रहण करण्याची लीला केली. त्यामुळे या दिवसाचे विशेष महत्त्व तर आहेच पण उपासनेसाठी देखील आणखीन एक दिवस सर्व स्वामीभक्तांना या समाधी लीलेच्या निमित्ताने या दिवशी मिळाला आहे.

चला तर अाजच्या दिवशी अक्कलकोट येथील ब्रह्मांडनायक श्री स्वामींच्या समाधीचे दर्शन घेऊया, श्री स्वामींचे पुण्यस्मरण करूया व सोबत श्री स्वामी समाधी प्रसंगाचे वर्णन करणारा हा अप्रतिम लेख सर्वांनी वाचूया आणि शेअर करून सर्वांना तो वाचायला देऊया. श्री स्वामी समर्थ.

*[श्री स्वामी समाधी दिनानिमित्त हा विशेष लेख. कृपया लेख पूर्ण वाचा व शेअर करा.]*


(श्री स्वामी समर्थ समाधी मंदिर, अक्कलकोट)


** *हम गया नही, जिंदा है* ** 
** *(लेखक- श्री. विवेक दिगंबर वैद्य)* **

अक्कलकोटचे श्रीस्वामीसमर्थ महाराजांच्या समाधीग्रहणाला १४ एप्रिल २०१८ अर्थात चैत्र कृ. १३ रोजी १४० वर्षे पूर्ण होत आहेत. कळिकाळाच्या क्षणिक झोपेतही सर्व भक्तांच्या योगक्षेमाची काळजी घेण्याची आश्वासकता जपणाऱ्या महाराजांच्या निर्याणासंबंधी धीचा "यांनी लिहिलेला हा विशेष लेख.

सलगर येथून परतलेले स्वामी महाराज अक्कलकोटास आले आणि उतरले ते थेट ‘संतांचा मठ’ येथे. त्या परिसरातच असलेल्या एका लिंगायत साधूच्या समाधीस्थानापाशी स्वामी महाराजांची स्वारी अंमळ विश्रांतीसाठी पहुडली. स्वामी अक्कलकोटास परतले याची बातमी कानी आल्यावर, त्यांच्या दर्शनासाठी ताटकळत असलेले भक्तगण लागलीच संतमठाच्या दिशेने धावले. स्वामींच्या निद्रीस्त मुद्रेकडे भावपूर्ण, श्रद्धायुक्त वृत्तीने पाहत सर्वजण त्यांच्या नामस्मरणात दंग झाले. काही वेळाने स्वामी जागृतावस्थेत आले तेव्हा नित्य दर्शनासाठी भक्तांची रीघ लागली.

वातावरणात उत्सवी रंग भरला गेला. ठाकुरदासबुवा कीर्तनासाठी उभे राहिले. सुमारे एक प्रहर कीर्तनाचा ‘गजर’ घुमला. सोबत बावडेकर पुराणिकबुवाही होते. स्वामींचे लक्ष एकाएकी त्यांच्यापाशी गेले तसे स्वामींनी बुवांना चार टोपल्या गोवऱ्या आणण्यास सांगितले. स्वामी महाराजांच्या सांगण्यानुसार सेवेकऱ्यांनी लिंगायत साधूच्या समाधीस्थानावरील शिवलिंगाच्या वर आणलेल्या गोवऱ्या रचून ठेवल्या. शिवलिंग त्या गोवऱ्यांच्या राशीखाली दिसेनासे झाले तेव्हा स्वामी आज्ञेनुसार त्यावर मणभर तूप ओतवले गेले. भक्तांनी प्रसादरूपाने समोर ठेवलेल्या खारका, नारळ, सुपाऱ्या देखील स्वामींनी गोवऱ्यांवरच ठेवण्यास सांगितल्या. एवढा जामानिमा झाल्यावर स्वामींनी त्या गोवऱ्यावर अग्नी पेटविला. ही वेळ संध्याकाळची. तो संपूर्ण दिवस स्वामी महाराज उपाशीवस्थेत होते. आगीचा कल्लोळ झाला. रात्रभर गोवऱ्या विलक्षण आवेगाने जळत राहिल्या. इथे आपल्या साधूच्या समाधीवर गोवऱ्या पेटवण्यात आल्याचे वृत्त कळताच लिंगायत समाजातील काही मंडळी रागारागाने तिथवर येऊन पोहोचली. मात्र स्वामी महाराजांचे मुखतेज पाहून ही मंडळी जेथल्या तिथेच स्तब्ध होऊन उभी राहिली. त्यांच्या जणू चित्तवृत्तीचाच पालट झाला होता. चहूबाजूने भडकलेली आग अखेर स्थिरावली. दिवस उजाडल्यावर स्वामी महाराजांनी भुजंगा सेवेकऱ्याकरवी त्या परिसरातील राख झटकून, साफ करून शिवलिंग व समाधी पाण्याने धुवून स्वच्छ करून घेतली. आगीच्या कल्लोळात दगडी शिवलिंगाचे तुकडे तुकडे झाले असावेत असा एव्हाना सर्वाचाच ग्रह झाला होता. मात्र घडले ते निराळेच. शिवलिंग अधिकच तेजाने उजळून निघाले होते. आगीच्या कठोर धगीमुळे समाधी मंदिराच्या भिंतीचे चिरे तडकले होते, दरवाजास भेगा पडल्या होत्या. मात्र शिवलिंग अभंग राहिले, उलट तेजाने झळाळून उठले.
स्वामी महाराजांच्या या कृतीचे आकलन कुणासही झाले नाही. आजपर्यंत कुणा सत्पुरुषाच्या हातून हे घडले नव्हते आणि पुढे कधी घडले देखील नाही. स्वामी महाराजांना नक्की काय सुचवायचे होते? जे घडले ते शुभसूचक होते की अशुभाची नांदी? घडल्या प्रकाराने स्वामी महाराज विचलित झालेलेही कुणाला जाणवले नाही. ते त्यांच्या नित्य ब्रह्मतत्त्वाच्या रंगात मिसळून गेले होते. हे जरी खरं असलं तरी त्यांच्या अंतरंगाशी एकरूप झालेल्या त्यांच्या भक्त मंडळींपकी काही मोजकीच मंडळी अशी होती की या घटनेमुळे त्यांच्या सर्वागावरून अशुभाचा वारा फडफडून गेला. क्षणभरासाठी का होईना.. त्यांच्या समोर अदृश्याची काळी सावली प्रगटली आणि विरून देखील गेली. क्षणभरासाठी का होईना.. वाऱ्याच्या एका चुकार झुळकेमध्ये त्या सर्वानाच अरिष्टाचा दर्प जाणवला. क्षणभरासाठीच का होईना.. त्या सर्वाच्या मनात एकाच वेळी भविष्याचे अस्पष्ट पडसाद उमटले, ‘स्वामी अवताराची अखेर होणार काय?’ सर्वानी एकाच वेळी झर्रकन स्वामींच्या दिशेने पाहिले तेव्हा स्वामी महाराजांच्या मुखावर मिस्कील हास्य विलसत होते.

कुणीतरी बाळाप्पा यांना सांगून गेले की स्वामी महाराज मुरलीधराच्या देवळानजीक असलेल्या एका तळ्यामध्ये उतरून त्यांच्या सोबत असलेल्या सेवेकऱ्यांना एक दगडाची कुंडी पाण्यात बुडविण्यास सांगितले आणि सेवेकऱ्यांनी तसे करताच एकाएकी मोठय़ांदा ‘सर्व मंडळी रडा, बोंबा ठोका’ असाही पुकारा स्वामींनी केला. त्या माणसाचं ते कथन ऐकून बाळप्पाच्या मनात चर्र झालं.
काही दिवसांपूर्वी स्वामी महाराजांनी आपणांस ‘आम्हांला उंच उंच जावयाचे आहे. फार लांब जावयाचे आहे.’ असे सांगितल्याचे बाळाप्पांना आठवले. त्यामागोमाग कुणा सेवेकऱ्याने ‘स्वामी महाराज आजकाल चौकोनी खडे बाजूबाजूला मांडून समाधी स्वरूप आकार तयार करतात’ अशी बातमी दिल्याचेही आठवले आणि त्याचसोबत काही दिवसांपूर्वी स्वामींनी कुणीतरी बाळाप्पा यांना सांगून गेले की स्वामी महाराज मुरलीधराच्या देवळानजीक असलेल्या एका तळ्यामध्ये उतरून त्यांच्या सोबत असलेल्या सेवेकऱ्यांना एक दगडाची कुंडी पाण्यात बुडविण्यास सांगितले आणि सेवेकऱ्यांनी तसे करताच एकाएकी मोठय़ांदा ‘सर्व मंडळी रडा, बोंबा ठोका’ असाही पुकारा स्वामींनी केला. त्या माणसाचं ते कथन ऐकून बाळप्पाच्या मनात चर्र झालं.

काही दिवसांपूर्वी स्वामी महाराजांनी आपणांस ‘आम्हांला उंच उंच जावयाचे आहे. फार लांब जावयाचे आहे.’ असे सांगितल्याचे बाळाप्पांना आठवले. त्यामागोमाग कुणा सेवेकऱ्याने ‘स्वामी महाराज आजकाल चौकोनी खडे बाजूबाजूला मांडून समाधी स्वरूप आकार तयार करतात’ अशी बातमी दिल्याचेही आठवले आणि त्याचसोबत काही दिवसांपूर्वी स्वामींनी शिवलिंगावर गोवऱ्या जाळून होम केला होता हे ही त्यांना आठवले. स्वामींच्या या कृतीमागचा अर्थबोध काही केल्या होत नव्हता. गेले काही दिवस स्वामी महाराजांच्या स्वभावातील आक्रमकपणा निवळतो आहे तसेच अधूनमधून दुश्चिन्ह दर्शवणारी वाक्ये स्वामी महाराजांच्या मुखातून निघत आहे याचा अर्थ स्वामी निर्याणकाळ जवळ तर आला नसावा ना? क्षणभर मनात आलेल्या या शंकेनेच बाळप्पा गर्भगळीत झाले. स्वामींच्या ‘असण्याची’ सवय शरीरातील अणुरेणूत अशी काही भिनली गेली होती की त्यामुळेच, त्यांच्या ‘नसण्याची’ कल्पना देखील बाळप्पांना नखशिखांत हादरवून गेली.

तात्या सुभेदारांच्या घरचा प्रसंग. दुपारची वेळ. स्वामी महाराजांना शौचास जाववून आणले. तेव्हा ते बसल्या जागीच लवंडले. हे पाहून सेवेकरी मंडळी घाबऱ्या घुबऱ्या अवस्थेत तिथे गोळा झाली. त्यावर स्वामी म्हणाले, ‘ पटकीने मला ढकलले.’

त्या दिवशीचा बराचसा काळ स्वामी ज्वराच्या अंमलाखाली होते. अंगात अतिशय ताप भरून राहिला होता. सायंकाळी स्वामींना मुरलीधराच्या मंदिरामध्ये नेण्यात आले. तिथंच मुक्काम झाला. प्रकृतीस रेच होऊन थोडा आराम पडला तशी दुसऱ्या दिवशी महाराजांस पालखीत बसवून नागणहळ्ळीस नेण्यात आले. तेथील आमराईत चार दिवसांची विश्रांती झाली. मात्र तिथल्या मुक्कामात स्वामी महाराजांनी अन्न वज्र्य केले. पोटात अन्नाचा कण नव्हता. प्रकृतीस आराम पडत नव्हता. अवस्था बिकट आहे हे ओळखून सखाराम लोखंडे सेवेकऱ्याने स्वामी महाराजांना पुन्हा वटवृक्षाकडे येण्याची प्रार्थना केली. स्वामींनी त्याच्या प्रार्थनेचा स्वीकार केला तसे त्यांना पालखीत घालून पुन्हा अक्कलकोटास आणले गेले. वटवृक्षाच्या सान्निध्यात पुन्हा एकदा स्वामी महाराजांची ‘काया’ स्थिरावली.
असे असले तरी महाराजांचा अन्नत्याग सुरूच होता. अंगात तापाचा जोर वाढत असला तरी चेहऱ्यावर वेदना, कणकण यांचा लवलेशही नव्हता. सर्वकाही सुखनव, आनंदमय, आणि स्वामीमय असले तरी स्वामींच्या मुखातील प्रत्येक शब्द त्यांच्या निर्याणाविषयी सुचीत करीत होता. स्वामींनी त्यांच्या गोपाळ न्हाव्याला बोलावून त्याचेकडून श्मश्रू करवून घेतले. त्यानंतर महाराजांस मंगलस्नान घालून आरती केली गेली, षोडशोपचारविधी करण्यात आले. वातावरणात तात्पुरतं का होईना चैतन्य दाटलेलं असलं तरी इथे 'चैतन्याचा कोंभ’ मात्र उदासलेला होता. चेहऱ्यावरील कोटी सूर्याचं तेज ग्रहणातल्या स्पर्शकाळागत झाकोळलं गेलं होतं. आनंदाचा कंद नैराश्याचा धागा चाळवीत स्वस्थ बसला होता. शरीराचा दाह वाढतच होता. तेजाने आतबाहेर कल्लोळ मांडला होता. वृत्तीची निवृत्ती काय असावी हे दाखविण्याचाच जणू तो प्रयत्न होता.

त्याचवेळी हे वातावरण बदलावं म्हणून प्रयत्नांची पराकाष्ठाही केली जात होती. नामांकित वैद्य मंडळी, अंगारे धुपारे घालणारे, जो तो आपापल्या परीने ह्या अवचित येऊ घातलेल्या परिस्थितीला दूर लोटू पहात होता. तेवढय़ात कुणीतरी स्वामी महाराजांना विचारलं की, ‘महाराज, तुम्ही केव्हा उठाल?’ त्यावर महाराज चटकन म्हणाले, ‘डोंगर बोलतील तेव्हा उठेन! पंढरी जळेल तेव्हा उठेन.’ त्यांच्या या उत्तरावरून त्यांच्या मनीचा कल सर्वाच्याच ध्यानात येऊन गेला. तरीही भक्तांची त्यांच्यावर असलेली अपरंपार माया हे सत्य स्वीकारण्यास तयार नव्हती. औषधोपचार, अंगारे धुपारे चालूच होते. इथे महाराज, त्यांना दिलेली औषधे थुंकून टाकू लागले. अन्न पाणी तर त्यागलेलेच होते. आता वृत्तीचाही संक्षेप करू लागले.

काही काळ अशाच अवस्थेत पुढे सरकला. वटवृक्षाच्या बुंध्याला टेकून बसलेल्या स्वामी महाराजांनी सेवेकऱ्यास सूचना केली. आपले म्हणून जे जे काही वस्त्रादी सामान, वस्तू आहेत त्यास विहिरीत टाकून देण्याची त्यांनी आज्ञा केली तसेच आपल्या सभोवती सहवासातील जी काही गायी-वासरे-बैल-घोडी आहेत त्यांना आपल्यापाशी घेऊन येण्यास सांगितले.

चैत्र शुद्ध १३. दुपारची वेळ. महाराजांच्या अतर्क्य सूचनेने भक्तगण बावरून गेले होते. मात्र त्यांनी केलेली सूचना मान्य करणे ओघानेच आले. स्वामींच्या सांगण्यानुसार सर्व जनावरे तिथं आणली गेली. स्वामींनी अतिशय वात्सल्याने त्या सर्वाच्या मुखावरून हात फिरवला. त्या दिवशी त्यांच्या समोर आलेल्या नेवैद्य भोजनाची ताटे त्यांनी या मुक्या प्राण्यांसमोर ठेवली. आपली काही वस्त्रे त्या जनावरांवर पांघरली. सर्वाचे सर्व काही निगुतीने झाल्याची खात्री बाळगून हा पुराणपुरुष पुन्हा एकदा वटवृक्षाखाली येऊन बसला.

थोडा काळ सरला असेल, आणि स्वामींनी श्रीपादभटास सूचना करून वटवृक्षाच्या बुंध्याजवळ तक्क्या आणून ठेवावयास सांगितला. तसे झाल्यावर श्रीपादभटाच्याच मदतीने स्वामी महाराज आसनमांडी घालून त्या तक्क्यास टेकले, वटवृक्षाखाली स्थिर झाले आणि पाहता पाहता निजानंदी मग्न झाले. एकाएकी डोळ्यांच्या पापण्या हलण्याच्या राहिल्या. चेहऱ्यावर प्रसन्नवृत्ती विलसत होती. सात फुटांचा तो अजस्र देह कळिकाळाला अंगावर वागवीत तिथंच स्तब्ध झाला. वातावरणात एकाएकी औदासिन्याची कळा पसरली. दिवसाढवळ्या वटवृक्षावरील वाघळांचा फडफडाट त्या वातावरणाला दुश्चिन्हाचं भान आणता झाला तशी भक्तांनी तारस्वरात हंबरडा फोडला. हुंदक्यांचे अस्फुट कढ गगनभेदी किंकाळ्यांतून प्रसविले आणि त्यातच त्या मुक्या जनावरांचे अर्थपूर्ण विलाप वातावरणास गहिरा अर्थ प्राप्त करून देते झाले. गाय, बैल, कुत्र्यांच्या नजरेतून कारुण्याचे बांध कोसळले आणि त्याचवेळी, त्या वातावरणाला आश्वासकतेचा छेद देण्यासाठीच की काय स्वामी महाराज कळिकाळाच्या क्षणिक झोपेतून पुन्हा एकदा जागे झाले. तिथं जमलेल्या प्रत्येकाकडे निर्मळ आनंदाचा कटाक्ष टाकीत स्वामींनी आपल्या मुखातून अखेरची दिव्यवाणी प्रसविली.

अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जना: पर्युपासते।
तेषा नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्॥

सर्व भक्तांना त्यांच्या योगक्षेमाची पूर्ण काळजी घेणार असल्याचे अभयवचन देत, क्षणभरासाठी परतलेलं ते रसरशीत चैतन्य पुन्हा देहरुपात प्रगट न होण्यासाठीचं वर्तमान प्रगट करोन अंतर्धान पावलं. दु:खाच्या हलकल्लोळात सामावून गेलं. अवघं ‘अक्कलकोट’ असुरक्षिततेच्या लाटेनं गिळंकृत केलं. वातावरणाला नैराश्याची पुटं चढली. सर्वत्र उदासीनतेचा काळोख साचून राहिला. पाण्याचं प्रवाहीपण गोठलं आणि रया गेलेल्या कळाहीन शरीराला धारण करणारी ती भक्तमंडळी जिवंत प्रेतासमान भासू लागली.
सातशे वर्षांचा प्रदीर्घ प्रवास आपल्या विस्तीर्ण भालप्रदेशावर सहजपणे वागविणारा तो ‘बालोन्मत्तपिशाच्च’ वृत्तीचा ‘पुराणपुरुष’ केवळ आठवणींचा ‘धनी’ होऊन राहिला. रागाने थरथरणारा आणि गडगडाटी हास्याने डुचमळणारा तो अवाढव्य देह समाधीमंदिराच्या तळघरातील काळोखात मिसळून गेला. कोटी कोटी सूर्याचे तेज अवतारसमाप्तीच्या मळभाने आच्छदलं गेलं आणि अमांगल्य जाळून टाकणारी स्वामींची भेदक, तीक्ष्ण नजर बंद पापण्यांच्या आत थिजून गेली. ‘श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ’ ह्या मंत्रगजरातून प्रगटलेले ते परब्रह्माचं लसलसतं सौंदर्य काळसर्पाच्या ‘विळख्यात’ हरवून गेलं. हे सर्व काही जरी खरं असलं तरी ते अंतिम सत्य होतं का? स्वामी समर्थ महाराजांचं अनंताच्या प्रवासाला निघून जाणं हे खऱ्या अर्थाने त्यांचं ‘कायमचं’ जाणं होतं का? केवळ शरीराचा त्याग म्हणजे परमेश्वरी तत्त्वाचा लोप होणं एवढाच त्याचा अर्थ होता का?

या आणि अशा अनेक प्रश्नांना कायमचाच पूर्णविराम देण्यासाठी तिथं आणखी एक निमित्त घडलं.

अवचित आलेल्या मळभाचं ग्रहण सोडविण्यासाठी तिथं प्रकाशाचा एक दिव्य तेजस्वी किरण अनाहूतपणे प्रगटला आणि पाहता पाहता त्याच्या साथीदारांनी उजेडाच्या पिवळाधम्मक प्रकाशात तिथे तेजाचा ‘सडा’ शिंपला. कुंद वातावरण थोडंफार सलावलं. दूरवर कुठंतरी चिमण्या चिवचिवू लागल्या. पक्ष्यांनी एकच किलबिलाट मांडला. तेव्हढय़ात, अनावर होऊन भुकेजलेलं एक निरागस वासरू वास्तवाची जाणीव भिरकावून देत मोठय़ांदा हंबरलं. गर्दीच्या त्या कोलाहलातही त्यानं सहजपणे आपल्या मातेला शोधून काढलं आणि मोठय़ा आवेगानं तिची आचळं लुचू लागलं. विझू पाहात असलेल्या नैराश्याला दूर सारणारी चैतन्यमयी सृजनाची ती पहिलीवहिली ओळख तिथं प्रगटली. तशी दूरवर कुठूनशी कस्तुरीचा सुगंध घेऊन आलेली वाऱ्याची अवखळ झुळूक एकाच वेळी प्रत्येकाच्या कानात विलक्षण धिटाईने कुजबुजली -
‘हम गया नही.. जिंदा है।’

लेखक - श्री. विवेक दिगंबर वैद्य

संकलन : श्री स्वामी समर्थ भक्त परिवार समूह 
(FB https://www.fb.com/shreeswamisamarth)
(WhatsApp : 7021942657)

राजाधिराज श्रीस्वामी समर्थ महाराजांशी संबंधित आणखीन दुर्मिळ व अस्सल (Exclusive & Authentic) माहितीसाठी व इतर अध्यात्मिक माहितीपर मेसेजेस वाचण्यासाठी आपल्या श्रीस्वामी समर्थ  भक्त परिवाराचे खालील फेसबुक पेज अवश्य लाईक करावे ,व्हॉटसअॅप लिस्टला जॉईन व्हावे किंवा ब्लॉगला फॉलो करावे. 



तसंच अधिकाधिक लोकांना व ग्रुपमध्ये हा मेसेज फेसबुक, व्हॉटसऍप इ. माध्यमाद्वारे या दोन्ही लिंकसकट व संपूर्ण आवाहनासहित शेअर करावी ही नम्र विनंती.

॥ राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय ॥

आपले नम्र
श्री स्वामी समर्थ भक्त परिवार, फेसबुक समूह
https://www.facebook.com/groups/shreeswamisamarth

1 comment:

  1. फार छान।मन भरून आले।तो काळ डोळ्यासमोर आला।श्री स्वामींची सर्वांवर कृपा अहेचणी ते गेले नाहीतच।आपल्यात आहेत।आणि तशी अनुभूती आपल्याला येते।

    ReplyDelete